शरद पवार उद्या दिल्ली विरोधी पक्षांची बैठक घेणार
![The Center should first pay GST to the state on time, said Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/shard-pawar.png)
नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आजचा १३ वा दिवस आहे. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (९ डिसेंबर) सर्व विरोधी पक्षांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. यात भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.
शरद पवार उद्या अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार आहे. यावेळी पवारांसोबत सीताराम येचुरी आणि डी. राजा असतील अशी माहिती मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या पवारांच्या अध्यक्षतेखाली सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत कृषी कायद्याबाबत विरोधकांची रणनिती ठरवली जाण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला किंमत १०० टक्के मिळाली पाहिजे. त्याबाबत बंधन असलं पाहिजे. नव्या कायद्यात सक्तीचा अभाव आहे. त्याबाबत उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर लोकमत समुहाने त्यांची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत पवार यांनी ही भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्रातील कृषी बाजार समितीची शेती आणि उत्तर भारतातील शेती यात फरक आहे. आपल्याकडे बाजार समित्यांची रचना साधारणपणे शेतकऱ्यांना मान्य असणारी आहे. आम्ही लोकांनीच विचारविनिमय केला. त्यात शेतकऱ्यांना काही स्वातंत्र्य देण्यात यावे, अशी सूचना समोर आली. त्याबाबत महाराष्ट्राने यापूर्वी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की कृषी बाजार समिती कायम आहे. शेतकऱ्यांना याठिकाणी येऊन शेतमाल विक्रीचा अधिकार आहे. तिथे माल विकताना त्याची किंमत त्याच्या पदरात पडेल, यासाठी खरेदीदारावर बंधनं आजही इथं कायम आहेत,’ असंही पवार म्हणाले.