राज्यातील काही भागात १० अंशाच्याही खाली पारा
मुंबई – डिसेंबर महिना उजाडला तरी तापमान वाढत असल्याने गुलाबी थंडीचा अनुभव घेता येत नव्हता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तापमानात घट होत असल्याने राज्यात गुलाबी थंडी पसरली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान घसरले असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडी वाढली आहे.
राज्यातील काही भागात पारा १० अंशाच्याही खाली घसरला आहे. त्यामुळे पहाटेच्या हवेत चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत.
दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही तापमानाचा पारा घसरला आहे. सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे मुंबईतील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.
राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
- नाशिक – 11.1°C
- परभणी – 10.6°C
- परभणी अॅग्री युनिव्हर्सिटी – 8.8°C
- पुणे – 11.5°C
- सांताक्रुझ – 18.4°C (यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान)
- जळगाव – 12.6°C
- बारामती – 11.9 °C
- औरंगाबाद – 13.0°C
- गोंदिया – 10.5°C
- नागपूर – 12.4°C