पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाहेरून आलेलं म्हणणं हा सुप्रिया सुळेंचा बालिशपणा – गोपीचंद पडळकर
सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणे हे खासदार सुप्रिया सुळे यांचा बालिशपणा आहे. त्या लोकसभेच्या सदस्या असून त्यांना अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचं आहे, असा टोला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
सोलापुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सुप्रिया सुळे यांनी काल (28 नोव्हेंबर) पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर टीका केली होती. मोदींनी काल पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन शास्त्रज्ञांशी कोरोना लसीबाबत चौकशी केली. मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरुन सुप्रिया यांनी ‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’, असा टोला लगावला होता.
“एक लाख कोटींच्यावर गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली”, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला भाजपकडून गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सरकार संविधान मानत नाही
पत्रकार परिषदेत पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. “सरकारला एक वर्ष पूर्ण झालं तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम काय आहे, हे देखील सांगता आलं नाही. सरकारने कोणतेही आश्वासन पूर्ण केलं नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शपथेचा भंग केला. मग ते दसरा मेळावा असो किंवा परवाची त्यांची ‘सामना’ची मुलाखत. हे सरकार संविधानावर चालत नाही. माझा तर प्रश्न आहे, तुम्ही संविधान तरी मानता का?”, असा घणाघात त्यांनी केला. “देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. महाराष्ट्राला जे दिलं ते केंद्र सरकारने दिलं. राज्य सरकारने काय मदत केली ते महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने सांगावे. राज्य सरकार संवेदनशील नाही”, अशी टीका पडळकर यांनी केली.
कंगनाचं घर पाडता येतं पण आरक्षणासाठी बैठक घेता येत नाही – पडळकर
“राज्य सरकार कुठल्याही समाजाच्या आरक्षणविषयी प्रामाणिक नाही. मराठा समाजाविषयी तर नाहीच नाही. पत्रकार अर्णव गोस्वामी प्रकरणात लाखो रुपये देऊन वकील लावता येतो. मात्र मराठा आरक्षणाची कागदपत्रे वकीलांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. अभिनेत्री कंगना रनौतचं घर पाडणं महत्त्वाचं वाटतं. मात्र मराठा आरक्षण संदर्भात एक बैठक घेता येत नाही”, अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.