पुण्यातील रिक्षाचालकाला मिळणार लॉकडाऊनमध्ये केलेल्या मदतीची पोचपावती, वाचा सविस्तर…
पुणे – कोरोनामध्ये केलेल्या कामाची पोचपावती पुण्यातील एका रिक्षाचालकाला मिळणार आहे. अक्षय संजय कोठावळे या रिक्षाचालकाने लॉकडाऊनमध्ये 400 स्थलांतरित मजुरांना अन्न पुरवलं व कोरोना महासाथीत त्यांना राहण्याची सोय करून दिली. तो डिस्कव्हरी इंडियावरील ‘भारत के महावीर’ या मालिकेत झळकणार आहे.
कोरोनाच्या महासाथीत जेमतेम परिस्थिती असतानाही लोकांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या देशातील 12 जणांपैकी एक पुण्यातील हा रिक्षावाला आहे. तीन भागांमधील या सीरिजमध्ये अक्षय हा सोनू सूद आणि दिया मिर्झासोबत दिसणार आहे. कोरोना महासाथीत अक्षय गर्भवती महिला आणि वृद्धांना रुग्णालयात जाण्यासाठी मोफत सेवा देत होता. त्याशिवाय अक्षयने लग्नासाठी जमा केलेले 2 लाख रुपये लॉकडाऊनमध्ये स्थलांतरिक मजुरांच्या मदतीसाठी खर्च केले. त्यानंतर त्याला 6 लाखांचं डोनेशनही मिळालं. सध्या तो ते पैसे गरजूंसाठी खर्च करीत आहे.
सध्याचा कठीण काळ आहे. एक माणूस म्हणून गरजुंना मदत करणं आपलं कर्तव्य आहे. कोरोना महासाथीमुळे अनेकांच्या हातातलं काम गेलं, अनेकांवर उपासमारीची वेळ आली. मी हे सर्व पाहत होतो. त्यानंतर मी लग्नासाठी जमवलेले 2 लाख रुपये गरजूंसाठी खर्च केले. या मालिकेत सोनू सुदही दिसणार आहे. लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सुदने हजारो किलोमीटर पायी चालून घर गाठवणाऱ्या स्थलांतरिक मजुरांना घरी पोहोचविण्यासाठी बसेसची सोय करून दिली. सोनू सूदनेही अक्षयच्या कामाचं कौतुक केलं. कोरोना काळात अक्षयची रिक्षा पाहून अनेकांना मदत आणि आधार मिळत होता. त्याने आपल्या लग्नासाठी जमा केलेले पैसे स्थलांतरित मजुरांसाठी खर्च केले ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.