अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी! आज हायकोर्टात जाणार
मुंबई – अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अर्णब यांना आता १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. या निर्णयाविरोधात आज अर्णब गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत. दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अर्णब यांच्यावतीने लगेचच न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात होता, त्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
अर्णब यांना मुंबईतील निवासस्थानाहून बुधवारी सकाळी अटक करण्यात आले होते. मुंबई पोलीस आणि रायगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांना अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले होते. आपल्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा अर्णब यांनी न्यायालयात केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर न्यायालयाने अर्णब यांना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांकडून न्यायालयात अर्णब यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळली.