‘माझ्या कारकिर्दीत मी घराणेशाही किंवा गटबाजी कधीच अनुभवली नाही’ -अशोक सराफ
मुंबई| अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर विविध कारणांनी बॉलिवूड ढवळून निघालं. तेव्हा घराणेशाहीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. खरं टॅलेण्ट डावलून घराणेशाहीला अवास्तव महत्त्व दिलं जात असल्याचा सर्वत्र डंका पिटला जात होता.सोशल मिडीयावर याचे मोठे तीव्र पडसाद पाहायला मिळाले.
याच प्रवाहात मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही चालते, गटबाजी होते असे आरोप काहींनी केले होते. याच घराणेशाहीच्या मुद्द्यावर मराठी सिनेसृष्टीत आपलं बहुमूल्य योगदान देणारे प्रसिध्द दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी नुकतंच आपलं मत व्यक्त केलं आहे. खरंतर , अशोकजींनी बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्री या दोन्हीं माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ घराणेशाहीवर आपल मत रोखठोकपणे व्यक्त करत सांगतात,”मराठी इंडस्ट्रीत घराणेशाही नाही. मला माझ्या संपूर्ण कारकिर्दीत घराणेशाहीचा किंवा गटबाजीचा कधीच अनुभव आलेला नाही. तसंच आजही आहे, आजचे लोकप्रिय अभिनेते हे त्यांच्यातील टॅलेण्टमुळे ह्या ठिकाणी आहेत, ना की कोणी त्यांच्या गॉडफादरमुळे. तुम्हाला कदाचित घराणेशाहीमुळे यश नाही मिळणार पण टॅलेण्ट असेल तर तुम्ही यशोशिखरावर पोहचाल, तुमच्यात उत्तम टॅलेण्ट असेल तर यशापासून तुम्हाला कोणच रोखू शकत नाही.”