चंद्रपुरात आजपासून जनता संचारबंदी
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र आणि बल्लारपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रसार आणखी होऊ नये, संसर्गाची साखळी खंडित व्हावी, यासाठी आजपासून म्हणजेच 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरपर्यंत जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी या जनता संचारबंदीचे पालन करून स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनानेतर्फे करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तासांत 276 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दोन मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 4662 वर पोचली आहे. यात 2364 रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय बाधितांची संख्या 2245 आहे. तर आतापर्यंत 53 मृत्यू नोंदविण्यात आले आहेत.
संचारबंदीमध्ये सर्व रुग्णालय, औषधालय, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय, तसेच एमआयडीसीमधील सर्व आस्थापने सुरु राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण देखील सुरू राहतील. तर किराणा, भाजी-फळे दुकाने, बाजारपेठेतील इतर दुकाने बंद राहतील. बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील, परंतु ग्राहक सेवा मिळणार नाही त्याचबरोबर, चंद्रपूर शहर, दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरातील सर्व पानठेले, चहा टपऱ्या, हातगाड्या, फुटपाथवरील सर्व दुकाने बंद राहतील.