राज्यात 12-16 सप्टेंबर पर्यंत पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. कोरड्या हवामानामुळे उकाडा वाढला. मात्र आता राज्यात 12-16 सप्टेंबर पर्यंत पावसाच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात पाऊस राज्य व्यापेल. विशेषतः मराठवाडा, विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. तसंच शेतकरी बांधवांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
काल कोल्हापूर, सांगली मध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस अचानक बरसू लागल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कोकणातही 7 सप्टेंबर रोजी काही तास जोरदार पाऊस झाला. 6 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात 6 जण जखमी झाले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
अचानक हवामानात बदल झाल्याने ताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. सध्या कोरोना संसर्गाचा कठीण काळ सुरु आहे. त्यामुळे आरोग्यात होणाऱ्या बदलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.