देशात २४ तासांत ८९,७०६ नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली – भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात दररोज ७५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. मागील २४ तासांत देशात तब्बल ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहोचली आहे. यापैकी ८ लाख ९७ हजार ३९४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर देशात आतापर्यंत ३३ लाख ९८ हजार ८४५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून ७३ हजार ८९० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशभरात ८ सप्टेंबरपर्यंत ५ कोटी १८ लाख ४ हजार ६७७ नमूने तपासण्यात आले आहेत. भारताने कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत ब्राझीललाही मागे टाकले आहे. त्यामुळे आता आपल्या पुढे केवळ अमेरिका आहे. जगभरात अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.