पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून कृत्रिम पाणीटंचाई : नगरसेविका मंगला कदम
पिंपरी । प्रतिनिधी
पवना धरणामध्ये पाणी साठा कमी झाल्यामुळे माहे एप्रिल २०१९ पासून पिंपरी चिंचवड शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याची अंमलबजावणी आज अखेर चालू आहे. सध्या पिंपरी चिंचवड व मावळ पवना धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून पवना धरणामध्ये काल अखेर १०० टक्के पेक्षा जास्त पाणी साठा झालेला आहे व पवना धरणातून विसर्ग चालू झाला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरास पवना धरणातील पाणी साठ्याला धक्का न लावता रावेत येथील पावसाचे वाहून आलेले पाणी नियमितपणे उचलून दररोज पाणी पुरवठा करणे शक्य आहे. मात्र, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून शहरात कृत्रिम पाणीटंचाई केली जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी केली आहे.
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आपण एका बाजूला शहरात २४X७ पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करीत आहोत. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करीत आहोत. आणि ऐन पावसाळ्यात पाऊसाचे पुरसे पाणी असूनही एक दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहोत. हि बाब निश्चितच खेदजनक आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होत असल्यामुळे शहरातील सर्व भागांमधून नागरीकांच्या असंख्य तक्रारी येत आहेत. सत्ताधारी भाजपच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाजाचे नियोजन कोलमडले आहे. विशेषतः महिला भगिनींना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. लहान, मोठ्या सर्व सोसायट्यांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. शहरातील टँकर लॉबीला फायदा व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपा आणि महापालिका प्रशासनाने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली असून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. तातडीने ही पाणी कपात रद्द करावी, तसेच शहरात सर्वत्र समान व पुरेशा दाबाने दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा. ज्यावेळी धरणातील पाणी साठा कमी होईल त्यावेळी मनपा पदाधिका-यांची मिटींग घेऊन पाणी कपाती संदर्भात त्यावेळी निर्णय घेणेत यावा परंतु सध्या दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.