मुंबईकरांवरील पाणीटंचाईचे संकट काहीशा प्रमाणात कमी; तानसा तलाव ओव्हरफ्लो
मुंबईत ऑगस्ट महिन्यात झालेल्या पाऊस मुंबईकरांसाठी धुमाकूळ घालणारा होता तरी त्या पावसाने मुंबईतील तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने मुंबईकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार कायम होती. मात्र मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा तानसा तलाव काल संध्याकाळी 7.05 मिनिटांनी ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे ही बातमी मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे . यामुळे मुंबईकरांसमोर उभे असलेले पाणीटंचाईचे संकट काहीशा प्रमाणात नक्कीच कमी होणार आहे.
मागील वर्षी 25 जुलै 2019 लाही तानसा तलाव हा ओसंडून वाहू लागला होता असेही मुंबई महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या धरण आणि तलावक्षेत्रामध्ये ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस बरसल्याने आता मुंबईकरांवरील पाणीकपात 20% वरून 10% करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने केला आहे. दरम्यान 21 ऑगस्टपासून आता मुंबई शहर आणि बीएमसीकडून पाणीपुरवठा होणार्या ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि आजुबाजूच्या गावांनादेखील दिलासा मिळणार आहे.
दरम्यान पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी याच दिवसापर्यंत मुंबईच्या पाणीसाठ्यात 94.28% जलसाठा होता. 2018 साली 91.83% जलसाठा होता.