पश्चिम रेल्वे वाहतूक ठप्प! मध्य रेल्वे धीम्या गतीने सुरू
मुंबई – मुंबईसह उपनगरांत आणि परिसरात रात्रभर पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली पश्चिम रेल्वे वाहतूक पावसामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर मध्य रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू असून हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सीएसएमटी वाहतूकही बंद झाली आहे. दरम्यान, रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही मोठ्या प्रमाणात कोलमडली आहे.
दरम्यान, मुंबईतील वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तसेच पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत शहरात 230.06 मिमी, मुंबई पूर्व उपनगरात 162.83 मिमी, मुंबई पश्चिम उपनगरात 162.28 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.