१ ऑगस्टपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर चाकरमान्यांची रॅपिड टेस्ट होणार
सिंधुदुर्ग – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून खारेपाटण या जिल्ह्याच्या सीमेवर महसूल, आरोग्य आणि पोलीस यांचे पथक अधिक कडक कार्यरत करून प्रत्येक चाकरमान्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिली आहे.
कोरोनामुळे गणेशोत्सवासाठी गावात आणि शहरात येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला १४ दिवस क्वारंटाईन हा निर्णय आहे, परंतु १४ दिवस क्वारंटाईन राहणे व त्यानंतरचे गणपती उत्सवातील दिवस काही चाकरमान्यांना न परवडणारे असल्यामुळे सात दिवसाचा क्वारंटाईन कालावधी करावा अशी मागणी होती. परंतु भारत आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार १४ दिवसाचे क्वारंटाईन हे महत्त्वाचे असल्याने आणि सरपंच संघटनांनी १४ दिवसच निश्चित ठेवावे यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे गावात येणाऱ्या चाकरमान्यांनी ७ ऑगस्टपूर्वी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे, या आवाहनानुसार अनेक चाकरमानी येत आहेत. यामुळे १ ऑगस्टपासून जिल्ह्यातील खारेपाटणसह अनेक सीमा नाक्यांवर महसूल, पोलीस आणि आरोग्याची पथके कार्यरत करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांची रॅपिड टेस्ट व औषधोपचाराचा पुरवठा ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची तपासणी व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे सोयीचे होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने १ ऑगस्टपासून महसूल, आरोग्य आणि पोलीस पथके सज्ज ठेवण्याचे निश्चित केले आहे. तसेच रुग्णालयात जादा खाटांची सोय केली आहे.