‘ऑगस्टच्या अखेरपर्यंत रुग्ण वाढतच राहणार’- आरोग्यमंत्री राजेश टोपे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/EXV9phRU8AADAlB.jpg)
राज्यातील कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मुंबई, पुणे व आसपासच्या परिसरात पुढच्या आठ दिवसांत रुग्ण आणखी कमी होतील, असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलाय. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यास ऑगस्टच्या अखेरपर्यंत रुग्ण वाढतच राहतील, त्यानंतर हे चित्र बदलेल,’ असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
पुणे, मुंबईतील रुग्ण वाढणार नाहीत. उलट पुढील आठ ते दहा दिवसांत रुग्णवाढीचा आकडा घसरत जाईल. पुणे व मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे स्थिर व्हायला आणखी काही वेळ लागेल. उर्वरीत राज्यात मागील काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळं पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत करोनाचे रुग्ण वाढतच राहतील. त्यानंतर घसरण सुरू होईल,’ असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला.
एखाद्या शहरातील २० ते २५ टक्के लोकसंख्येला करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णसंख्येत घसरण होते, असं सर्वसाधारण निरीक्षण आहे. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी टोपेंच्या या विधानाशी सहमती दर्शवली. मुंबईसह काही जिल्ह्यांनी रुग्णसंख्येचा कमाल आकडा गाठला आहे. त्यामुळं आता हा आकडा घसरू लागलाय,’ असं ते म्हणाले.
निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी करोना संदर्भातील गुंतागुंतीची माहिती दिली. ‘करोनाच्या रुग्णसंख्येचा राज्यातील ट्रेंड संमिश्र आहे. एका विभागाची परिस्थिती दुसऱ्या विभागासारखी नाही. प्रत्येक ठिकाणचं चित्र वेगळं आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी फक्त अकोला व अमरावतीतील रुग्णसंख्या आणि मृत्यूचा दर उत्तर महाराष्ट्राशी साम्य दाखवतो.
नागपूरमधील करोना मृत्युदर राज्यातील इतर कुठल्याही जिल्ह्याशी तुलना करता येण्यासारखा नाही. नागपूरमध्ये जवळपास ४ हजार रुग्ण आहेत. मात्र, तिथं ६५ पेक्षाही कमी मृत्यू झाले आहेत. इतर जिल्ह्यात हे प्रमाण खूपच वेगळं आहे,’ असं आवटे म्हणाले.