‘कोरोना संपल्यावर मनमानी करा’, आयुक्त शेखर गायकवाड यांच्या बदलीवरून गिरीष बापट-अजित पवार आमने-सामने
पुणे – कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असून पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. असे असताना पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या बदलीचा विषय आता चांगलाच पेटला आहे. भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी या निर्णयाचा विरोध करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, या विरोधात गरज पडल्यास आंदोलनाचाही इशारा दिला आहे. पुण्यातील कोरोना विरोधातील लढाई निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. अशा परिस्थितीत पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आली. या चुकीच्या निर्णयाचा मी निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
गिरीश बापट म्हणाले, “पालिका आयुक्त शेखर गायकवाड हे चांगलं काम करत होते. त्यामुळं या चुकीच्या निर्णयाचा मी निषेध करतो. त्याचबरोबर पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्यांचाही निषेध करतो. यासंदर्भात वेळ पडल्यास आंदोलनाचाही मार्ग स्विकारु.” आपल्या हातात सत्ता असून कोरोना संपल्यानंतर आपण मनमानी कारभार करु शकता, असा टोलाही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता लगावला.
मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली आश्चर्यजनक आहे. एकतर्फी लॉकडाऊन आणि त्यानंतर आयुक्तांची बदली करण्यात आलीय. एकीकड राजकारण करु नका, असं म्हणतात. मात्र, आता कोण राजकारण करतोय हे पुणेकरांना दिसत असल्याचं म्हणत बापट यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला.
शेखर गायकवाड हे आयुक्त म्हणून चांगलं काम करत होते. पुणे शहराची माहिती आवाका आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना राबवत होते. अशा परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. मात्र हा निर्णय चुकीचा असून पुणेकरांचं नुकसान होणार आहे. यामुळं कोरोना प्रतिबंधात्मक मोहीम थोडीशी शिथिल पडेल, असा दावाही बापट यांनी केलाय.