#CoronaVirus: कोरोनाबाधित मृताच्या अंत्यविधीसाठी शेकडोंची उपस्थिती
विरार : अर्नाळा येथे करोनाबाधित मृताच्या पार्थिवावरील अंत्यविधीला शेकडो लोक उपस्थित राहिल्याच्या प्रकारामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. याबाबत अर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये रविवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीची सभा घेवून आशा आरोग्य सेविकांच्या माध्यमातून परिसरातील घरोघरी आरोग्य तपासणीची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
विरार पश्चिमेकडील अर्नाळा परिसरातील ५८ वर्षीय व्यक्तीवर वसईतील एका रुग्णालयात यकृताच्या आजारावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. करोना चाचणीकरिता त्यांचे नमुने घेण्यात आले होते. मात्र, चाचणी अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शेकडो जणांच्या उपस्थितीत मृतावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी केवळ अर्नाळाच नव्हे तर आसपासच्या गावांतूनही अनेकांनी हजेरी लावली होती. त्यानंतर या मृताचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक असल्याचे निष्पन्न झाले.
घबराटीमुळे परिस्थिती बिकट होऊ नये, यासाठी वसईचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी ताबडतोब रविवारी संध्याकाळी अर्नाळा ग्रामपंचायतीत ग्रामस्थांची सभा घेतली. र्नाळा आणि परिसरात घरोघरी आशा सेविकांच्या माध्यमातून आरोग्यविषयक तपासणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. घरात कोणालाही ताप, खोकला किंवा अन्य काही फ्लूसदृश्य लक्षणे असल्यास ताबडतोब आशा सेविकांना त्याची माहिती देण्याचे आवाहन यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी उपस्थितांना केले.सदर प्रकरणी कार्डीनल ग्रेशिअर रुग्णालयातील मुख्य डॉक्टर, व्यवस्थापकासह मयताचे ६ नातेवाईक यांच्यावर अर्नाळा पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकूण ३६ लोकांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अंत्यसंस्कार समयी उपस्थित असलेल्यांची यादी तरी करण्याचे काम सुरू आहे.
रुग्णालय प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल
करोना चाचणीचा अहवाल आलेला नसतानाही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याप्रकरणी वसई-विरार शहर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णालय प्रशासनाविरुद्ध वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर अंत्यविधीला शेकडो जणांचा जमाव जमविल्याप्रकरणी मृताच्या कुटुंबातील सात व्यक्तींवर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतिष्ठित व्यक्ती तथा सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ग्रामस्थांशी समन्वय साधला जात आहे. घरोघरी आरोग्य तपासणी सुरू केली आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. भीतीने गांगरून जाण्याचे काहीच कारण नाही.
– स्वप्नील तांगडे, उपविभागीय अधिकारी, वसई
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये करोनाविषयक जनजागृती सुरू आहे. आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना करतानाच गावात स्वच्छता ठेवण्याकडेही ग्रामपंचायतीमार्फत लक्ष पुरवले जात आहे.
– महेंद्र पाटील, उपसरपंच, अर्नाळा ग्रामपंचायत