भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये मागील पाच महिन्यात केला ९३ दहशतवाद्यांचा खात्मा
सहा महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत म्हणजेच गेल्या पाच महिन्यांमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी ९३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू आणि काश्मीर या भागांमध्ये ही कारवाई झाली आहे. “आजच्या तारखेपर्यंत आम्ही जम्मू काश्मीरमध्ये ९३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मागील दोन दिवसात आम्ही नऊ दहशतवाद्यांना ठार केलं आहे. या दोन दिवसात भारतीय लष्कराचा एकही जवान शहीद झालेला नाही” अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.
काश्मीर खोरं आणि एलओसी या दोन्ही ठिकाणी दहशतवाद विरोधी कारवाया सुरु आहेत असंही लष्कराने स्पष्ट केलं आहे. दहशतवाद्यांचा टॉपचा म्होरक्या रियाझ नायकू यालाही ठार करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसेच जुनैद सेहराईलाही आम्ही ठार केलं आहे. जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दोन दहशतवादी संघटनांचे ते दहशतवादी होते असंही लष्कराने म्हटलं आहे.
मात्र दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जरी आम्ही यश मिळवलं असलं तरीही सुरक्षा दलांचंही नुकसान झालं आहे. केरन सेक्टरमध्ये गेल्या महिन्यात पॅरा मिलिटरीचे पाच जण शहीद झाले. त्यांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र या कारवाईत या पाचजणांचाही मृत्यू झाला. तसेच मे महिन्यात झालेल्या एका दहशतवादविरोधी कारवाईत एक कर्नल आणि तीन इतर लष्कराचे जवान शहीद झाले. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये एकही जवान किंवा अधिकारी शहीद झालेला नाही असंही लष्कराच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. येत्या काळात दहशतवाद्यांचा जास्त मोठ्या प्रमाणात खात्मा होण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. आणखी दहशतवादी शोधून त्यांना ठार करणं हे आमचं पुढील लक्ष्य आहे असंही लष्कराने स्पष्ट केलं.