Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘Wildcraft’ ला भारतीय लष्कराकडून मोठी ऑर्डर; कंपनीने Nike, Adidas, Reebok ला मागे टाकण्यासाठी कसली कंबर

साहसी खेळ आणि बॅगा बनवणाऱ्या वाइल्डक्राफ्ट या स्वदेशी कंपनीने नायकी, अदिदास, रीबॉक, प्युमा यासारख्या परदेश कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी कंबर कसली आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने भारतीय लष्कराबरोबर करारही केला आहे. याच जोरावर आता कंपनीने या वर्षी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सला मागे टाकण्याची तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीचे संस्थापक गौरव डबलिश आणि सिद्धार्थ सूद यांनी भारतीय लष्कराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवण्याबरोबरच या माध्यमातून कंपनीची वार्षिक उलाढाल एक हजार कोटींपर्यंत नेण्याचा उद्देश असल्याची माहिती दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्या प्रमाणे देश आत्मनिर्भर बनवण्याच्या मोहिमेमध्ये कंपनीही हातभार लावणार असल्याचे गौरव यांनी स्पष्ट केलं आहे. “भारतीय लष्कराने दिलेली ऑर्डरही आम्हाला मिळालेल्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ऑर्डरपैकी एक असून आम्ही लवकरात लवकर ती पुर्ण करणार आहोत. मागील वर्ष संपण्याआधीच आमच्या कंपनीची निविदा भारतीय लष्कराने स्वीकारुन आम्हाला ऑर्डर देण्यासंदर्भात करार केला आहे. आम्ही आता या ऑर्डरनुसार निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.”

बॅगांबरोबरच कंपनीने करोनाचे संकट लक्षात घेता खासगी सुरक्षेसंदर्भातील वस्तूंच्या निर्मितीची सुरुवात केल्याचे कंपनीने म्हटले आहे. मास्क, पीपीई कीट यासारख्या गोष्टींची निर्मिती करण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. ‘सुपरमास्क’ नावाने कंपनीने बाजारामध्ये मास्क विक्री सुरु केली आहे. “कंपनीच्या चाहत्यांच्या मदतीने कंपनीचा तोंडी प्रचार म्हणजेच माऊथ पब्लिसीटी मोठ्या प्रमाणात झाली आहे. देशातील सर्वात मोठी लाइफस्टाइल कंपनी बनण्याचा आमचा इरादा आहे. अपेक्षा आहे की २०२०-२१ पर्यंत आम्ही नायकी, आदिदास, रीबॉकच्या पुढे जाऊ आणि शक्य झाल्यास आम्ही प्युमालाही मागे टाकू,” अशी अपेक्षा गौरव यांनी व्यक्त केली आहे.

लष्कराची ऑर्डर

वाइल्डक्राफ्टला मागील वर्षी लष्कराकडून मोठी ऑर्डर मिळाली असून या ऑर्डरनुसार कंपनी लष्करासाठी दोन लाख रकसॅकची निर्मिती करणार आहे. ९० लीटरच्या या रकसॅकची डिझाइन आणि इतर गोष्टींना संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या बँगांच्या चाचण्याही झाल्या असून संरक्षण मंत्रालयाने कंपनीला निर्मितीला सुरुवात करण्यास सांगितले आहे. कंपनीचे सध्या कर्नाटकमधील बेंगळूरु आणि हिमाचल प्रदेशमधील सोनालमध्ये दोन मोठे कारखाने आहेत. लवकरच कंपनी देशातील ११ शहरांमध्ये ६५ नवे निर्मिती युनिट्स उभारणार असून एक लाख लोकांना रोजगार देणार असल्याचे समजते. कंपनी तेलंगणमध्येही एक मोठा कारखाना उभारण्यासंदर्भात विचार करत असल्याचे वृत्त ‘तेलंगण टुडे’ने दिलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button