जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा, मंत्री व अधिकाऱ्यांना कामाला लावा- शरद पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Sharad-pawar-and-Udhav-Tahkare.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली राज्यातील व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. लॉकडाऊनच्या काही अटी शिथील करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल. याकरता दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनाने आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी. दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील याकडे कृपया पहावे, असे शरद पवार यांनी म्हटले.
तसेच लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठीही सरकारने पावले उचलावीत, अशी सूचना पवारांनी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून राज्याचे मंत्री आणि अधिकारी यांची उपस्थिती वाढणे आवश्यक आहे. मंत्री व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी योग्य त्या सूचना निर्गमित व्हाव्यात, असे शरद पवार यांनी सांगितले.
* महाराष्ट्रातील नव्या बेरोजगार पिढीला, मराठी माणसाला रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांना उद्योग क्षेत्रात कसे सामावून घेण्यात येईल याचा कृती कार्यक्रम आखावा लागेल. पूर्वी मागास, अविकसीत भागात उद्योगांना प्रोत्साहन योजना राबवल्या जात. त्या धर्तीवर राज्यात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, उद्योग वाढीसाठी नवीन सवलतींचे प्रोत्साहनपर धोरण आणणे आवश्यक वाटते.
* आर्थिक तोटा सहन न झाल्यामुळे काही शैक्षणिक संस्था कोलमडतील अथवा बंद पडण्याची देखील शक्यता आहे. एकंदरीत विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचे नुकसान होऊ नये, शिक्षणात व्यत्यय येऊ नये याकरता वेळीच उपाययोजना करण्यासाठी एक अभ्यास गट अथवा समिती नेमावी.
* कोविड-१९ व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब लागेल. परिणामी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संख्येत घट होऊन शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान संस्था यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.