#waragainstcorona: शरद पवार यांच्या पुढाकाराने २५ हजार गलाई कामगार परतणार स्वगृही
– कोलकत्त्याहून शंभर गाड्या महाराष्ट्राकडे येण्यासाठी रवाना
मुंबई । महाईन्यूज। प्रतिनिधी
संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाशी सामना करत असताना लॉकडाऊनमुळे इतर राज्यांत अडकलेल्या महाराष्ट्रातील कामगारांना त्यांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग बंद झाला होता. मात्र, खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेवून संबंधित कामगारांना स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा केला.
सोने-चांदी भट्टीमध्ये काम करणारे (आटणी) महाराष्ट्रातील २५ हजार गलाई कामगार कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये अडकलेले होते. या कठीण काळात आपल्या गावाकडे कसे जायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.
दरम्यान, शरद पवार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला व कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती केली. तसेच खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित पवार यांनी देखील या कामगारांना परत आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पवार यांनी याबाबत जातीने लक्ष दिल्याने आज गलाई बांधवांच्या पहिल्या टप्प्यातील शंभर गाड्या कोलकत्त्याहून महाराष्ट्राकडे येण्यासाठी निघाल्या आहेत. कोरोना महामारीमुळे कामगारांवर मोठे संकट आले असता कामगारांच्या पाठीशी शरद पवार ठामपणे उभे राहिलेले दिसत आहेत.