#IndiaFightsCorona: महापालिकेने सील केलेल्या सेक्टर २२ आणि शहरातील सील केले भागा मध्ये जीवनावश्यक वस्तूंविना नागरिकांचे हाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/14-5.jpg)
– आयुक्तांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात, मनसे गटनेते सचिन चिखले यांची मागणी
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात करोना’चे अधिक रुग्ण आढळलेलले काही भाग महापालिका प्रशासनाकडून सील करण्यात आलेले आहेत. या भागात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने निश्चित करुन दिलेल्या वेळेत उघडण्यात येतील, अशा सूचना महापालिका प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. सील केलेल्या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घराबाहेर पडता येत नसल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळवितांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर मनसेचे अध्यक्ष तथा मनसे गटनेता सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेता, हा प्रसार आता कम्युनिटी ट्रान्सफरच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. निगडी यमुनानगरमधील सेक्टर २२ सह पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे, पुनावळे, भोसरी, पिंपळे सौदागर, मोशी, थेरगाव, खराळवाडी, दापोडी, घरकुल, चिखली, दिघी, कासारवाडी, च-होली, संभाजीनगर, रुपीनगर, पिंपळे गुरव, नेहरुनगर या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. नागरिक रहात असणारा परिसर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने सील केलेला आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडता येत नाही. नागरिकांची गैरसोय होत आहे.
अशा कंटेनमेंट झोनपैकी निगडी-यमुनानगर मधील सेक्टर २२ या परिसराचा विस्तार देखील मोठा आहे. त्यामुळे शहरातील इतर भागात व सेक्टर २२ मध्ये नागरिकांसाठी किराणा माल, राशन, दुध, भाजीपाला व फळे यांच्या हातगाड्या तसेच इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने परिसरात सोय करण्यात यावी, त्यामुळे त्या वस्तू खरेदी करणे त्यांना सुलभ जाईल, जेणेकरून त्यांचे हाल होणार नाहीत. आयुक्तांनी या मागणीचा विचार करून, शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, असे या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे.