देशात मोठे आर्थिक व्यवहार होणा-या भागातच कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर…
कोरोना विषाणूबाधित नसलेल्या भागांमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात पुन्हा एकदा काही उद्योग आणि दैनंदिन व्यवहार सोमवारनंतर सुरू करण्यात येणार आहेत. पण देशातील आर्थिक व्यवहार ज्या भागातून मोठ्या प्रमाणात होतात. तिथे सर्व ठिकाणी कोरोनाची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आणखी काही दिवस कडक निर्बंध कायम असणार आहेत. देशाची राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन्ही ठिकाणी कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे.
देशात सध्या कोरोनाबाधित असलेल्या जिल्ह्यांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये रेड, ऑरेंज, येलो आणि ग्रीन असे झोन करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण १०० पेक्षा जास्त आहेत. तो जिल्हा रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तर ज्या जिल्ह्यात एकही रुग्ण नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. २१ ते १०० रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज झोन ठरविण्यात आले आहेत. तर २० पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे येलो झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत.
या वर्गीकरणानंतर असे दिसून आले आहे की रेड झोनमध्ये असलेले २० जिल्हे हे शहरी भागातील आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होतात. पण तिथेच आता १०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यामुळे तिथे २१ एप्रिलनंतर सध्या तरी कोणताही दिलासा मिळणार नाही. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त याच जिल्ह्यांमध्ये आहेत. त्याचबरोबर एकूण मृत्यूंपैकी ६७ टक्के याच जिल्ह्यांमध्येच झाले आहेत.