दिल्लीत कोरोनाचा प्रसार रोखण कठीण,गावी जाण्यासाठी मजुरांची तुफान गर्दी
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. पण या लॉकडाऊन आणि संचारबंदीचा पुरता फज्जा उडाल्याचं दिल्लीत समोर आलं आहे. सरकारने आवाहन करूनही दिल्लीत हजारो मजूर आणि कामगारांनी आनंद विहार आणि धौलाकुआं भागात तुफान गर्दी केली आहे. यामुळे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव सरकार कसा रोखणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राहण्याची आणि खाण्या-पिण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने लॉकडाऊनमुळे हजारो मजूर आणि कामगारांना आपल्या गावाकडे परतण्याशिवाय कुठलाही मार्ग उरलेला नाही. पण केंद्र आणि राज्य सरकारांकडून या मजूर आणि कामगारांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांच्या राहण्याची आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही राजधानी दिल्लीतील मजूर ऐकण्यास तयार नाहीत.
मजूर आणि कामगारांना आपल्या गावाकडे जायचं आहे. यामुळे ते मोठ्या संख्येने रस्त्यांवर बाहेर पडले आहेत. खासकरून दिल्लीतील आनंद विहार बस स्थानकावर हजारो दाखल झाल्याने तिथे गोंधळाचं वातावरण आहे. चेंगराचेंगरीही होऊ शकते अशी तिथे परिस्थिती निर्माण झाली आहे.
गावाकडे जाण्यासाठी अतूर असलेल्या या मजूर आणि कामगारांना करोना व्हायरसची कुठलीही भीती नाहीए. त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे तो खाण्या-पिण्याचा आणि राहण्याचा. गावी गेल्यावर आपले प्रश्न सुटतील असं त्यांना वाटतंय. यादरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने दिल्लीच्या आनंद विहार या आंतरराज्य बस स्थानकावर त्यांनी गर्दी केलीय. बस पकडून कधी गावी जातो असा या मजुरांचा प्रयत्न आहे. मात्र या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे…