येस बँकेच्या पुनर्रचनेस केंद्राची मंजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Yes-Bank.jpg)
- खात्यातून रक्कम काढण्यावरील मर्यादा रद्द होणार
नवी दिल्ली | महाईन्यूज
आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेच्या पुनर्रचनेच्या रिझव्र्ह बँकेच्या योजनेला शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसंदर्भात लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी पैसे काढण्याची ५० हजार रुपयांची मर्यादाही रद्द होईल. भारतीय स्टेट बँक येस बँकेचे ४९ टक्के समभाग खरेदी करेल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
येस बँकेत खासगी बँकांनीही गुंतवणूक करण्याची तयारी दाखली आहे. आयसीआयसीआय बँकने एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँकेची येस बँकेत पाच टक्के गुंतवणूक असेल. रिझव्र्ह बँकेच्या पुनर्रचनेच्या योजनेसंदर्भात सहा मार्च रोजी मसुदा जाहीर केला गेला होता व हरकतीही मागितल्या होत्या. त्यानुसार योजनेला अंतिम स्वरूप दिले गेले आहे.
या योजनेनुसार स्टेट बँकेची ४९ टक्के गुंतवणूक असेल. स्टेट बँकेला किमान तीन वर्षे २६ टक्के गुंतवणूक येस बँकेत कायम ठेवावी लागेल. खासगी गुंतवणूकदारांसाठी ही मर्यादा ७५ टक्के इतकी असेल. योजनेची अधिसूचना जारी केल्यावर तीन दिवसांनी ५० हजारांची मर्यादा काढून घेतली जाईल. त्यामुळे खातेदारांना पैसे काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही. रिझव्र्ह बँकेने ३ एप्रिलपर्यंत ५० हजारांची मर्यादा लागू केली आहे.