नागरिकांनी घाबरू नका, पण काळजी घ्या : आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई | एका कोरोनाबाधित वयोवृद्ध रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, राज्यातील इतर रुग्णांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी माझाला दिली. तसेच, शाळांसंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 14 वर गेली असून कोरोनाचा देशातील पहिला बळी कर्नाटकात गेला आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. मात्र, स्वतःची काळजी घ्यावी, असं आवाहनही आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केलंय.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्तांची बैठक घेतली. यात बैठकीत काय करावे आणि काय करू नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. सध्या राज्यातील चौदापैकी फक्त एकाला श्वसनाचा त्रास होतोय. ज्यांचं वय 70 च्या वरती आहे. तर, अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं टोपे म्हणाले.