कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणारे सामाजिक कार्यक्रम पुढे ढकलण्याचे केंद्र शासनाचे निर्देश : आरोग्यमंत्री राजेश टोपे

डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ‘मास्क’ विकण्यास प्रतिबंध
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
देशातील करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणारे सामाजिक कार्यक्रम पुढे ढकलावेत असे निर्देश केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना दिले आहेत. ‘मास्क’ची होणारी साठेबाजी रोखण्याकरीता औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ‘मास्क’ विकू नयेत असे निर्देश राज्याच्या अन्न व औषध विभागाने सर्व संबंधितांना दिले आहेत. दरम्यान राज्यात आता पुणे व नागपूर विमानतळांवर देखील स्क्रींनिंग सुरु करण्यात आले आहे. सध्या 25 जण रुग्णालयात निरीक्षणाखाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
दि.६ मार्च पर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६८४ विमानांमधील ८३ हजार ५१६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व करोना बाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ५१६ प्रवासी आले आहेत.
दि. १८ जानेवारी 2020 पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २२९ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी २०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर २५ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या २२९ प्रवाशांपैकी २०४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबईत १६ जण तर नाशिक येथे ३ जण, पुणे येथे ४ जण तर नांदेड, सांगली येथे प्रत्येकी १ जण भरती आहेत.
*केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुढील सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे -*
o वुहान (चीन ) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.
o इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते.
o बाधित भागातून येणा-या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे.
o या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते.
o याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे.
o या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.





