राणीबागेच्या बागेतील वाघांच्या पिंजऱ्यासाठी सव्वा कोटी…
मुंबई | महाईन्यूज |
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेच्या बागेत प्राण्यांना निसर्गरम्य वातावरणात विहार करता यावा यासाठी पिंजऱ्यांची निर्मिती केली जात असून वाघांच्या पिंजऱ्यांमध्ये झाडे, झुडपे, वृक्ष, वेली व बांबूंचा वापर करून उद्यान तयार केले जाणार आहे. त्यामुळे नव्याने दाखल झालेल्या वाघाच्या जोडीला नैसर्गिक अधिवासाचा अनुभव घेता येईल. त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे.
सध्या राणीबागेचे नुतनीकरण सुरू आहे. त्याच बरोबर प्राणी व पक्ष्यांसाठी नवीन १७ अद्ययावत पिंजरे बसविण्यात येणार आहेत. बारशिंगा, तरस, कोल्हा तसेच काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयातून करिश्मा आणि शक्ती अशी वाघांची जोडी राणीबागेत दाखल झाली. ही जोडीला सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आली आहे. लवकरच राणीबागेतील मोकळ्या वातावरणातील पिंजऱ्यात त्यांना ठेवले जाईल. त्यामुळे पर्यटकांना ही जोडी पाहता येईल.
वाघाच्या पिंजऱ्याचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये वाघाचे नैसर्गिक अधिवास असलेल्या पिंजऱ्याच्या निर्मितीसोबत अनुकूल वातावरणाचीही निर्मिती केली जाणारे. पिंजऱ्याच्या बाहेरच्या भागातल्या उद्यानाचे सुशोभीकरण करून शोभिवंत झाडांची लागवड करण्यात येणार आहे. या सर्वांसाठी १ कोटी ३३ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.