रो-रो बोटसेवेची सुविधा लवकरच पर्यटकांसाठी उपलब्ध,अवघ्या 220 रुपयात गाठता येणार काशीद समुद्र…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-136.png)
मुंबई | महाईन्यूज |
रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सागरमाला प्रकल्पांतर्गत सुरू झालेल्या रो-रो बोटसेवेची सुविधा लवकरच पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांना आता मुंबईहून अवघ्या 220 रुपयात काशीद समुद्र किनारा गाठता येईल.
रायगड हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून पर्यटकांची पहिली पसंती ही काशीद समुद्र किनारा आहे. मुंबईवरून रस्ते, तसेच मांडवा वरून अलिबागला बोटीने व तेथून रस्ते मार्गे काशीद समुद्र किनारी पर्यटक येत असतात. त्यामुळे या प्रवासात खूप वेळ जात होता. तसेच खराब रस्ते, वाहतूक कोंडी याचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो. मात्र असे असूनही काशीद समुद्र किनारा हा पर्यटकांनी नेहमी बहरलेला असतो. हे लक्षात घेऊन रो- रो सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. कारण, रस्तेमार्गाने मुंबई ते अलिबाग हे अंतर साडे तीन तासांचं असून रो-रो सेवेमुळे आता हेच अंतर अवघ्या तासाभरात गाठता येणार आहे.
बहुप्रतिक्षित असलेल्या या सेवेसाठीचे दर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने या प्रवासासाठीचे दरपत्रक जारी केलं आहे. सामान्य वर्गातून प्रवास करणाऱ्यांसाठी 220 रुपये इतकं तिकीट ठेवण्यात आलं आहे. तर वातानुकूलित सेवेसाठी 330 आणि लग्झरी सेवेसाठी 550 रुपये असे दर आहेत. तर खासगी गाड्या घेऊन प्रवास करणाऱ्यांसाठी 1100 रुपये, 1500 रुपये आणि 1900 रुपये असे दर लहान, मध्यम आणि मोठ्या वाहनांसाठी ठेवण्यात आले आहेत. अर्थात हे दरपत्रक जारी करण्यात आलं असलं तरी अद्याप ही सेवा कधीपासून सुरू होणार आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.