केरळने राहुल गांधींना निवडून विनाशकारी काम केल : रामचंद्र गुहा
आपल्या कष्टाने पुढे जात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर ‘पाचव्या पिढीतील शासक’ राहुल गांधींना भारतीय राजकारणात कोणती संधी नसल्याचे वक्तव्य इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केले आहे. केरळच्या जनतेने राहुल गांधींना संसदेत पाठवून विनाशकारी काम केले आहे. जर केरळच्या जनतेने २०२४ मध्ये दुसऱ्यांदा राहुल गांधी यांना निवडून दिल्यास पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना आघाडी मिळेल, असेही ते म्हणाले.
कोझिकोड येथे आयोजित केरळ साहित्य महोत्सवात गुहा बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही लोकांनी (मल्याळी) संसदेत राहुल गांधींना का निवडले? मी राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. ते खूपच सभ्य आणि इतरांचा आदर करणारे आहेत. पण युवा भारताला पाचव्या पिढीतील शासक नकोय. जर तुम्ही मल्याळी लोक पुन्हा एकदा राहुल गांधींना वर्ष २०२४ मध्ये दुसऱ्यांदा निवडून देण्याची चूक केली तर याचा फायदा फक्त नरेंद्र मोदी यांनाच होईल. कारण नरेंद्र मोदी यांना हा एक मोठा फायदा आहे की, ते राहुल गांधी नाहीत.