धोकादायक कारखान्यांचे परिक्षण करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Dhulaplli-1024x768-1.jpg)
मुंबई | महाईन्यूज
तारापूर औद्योगिक वसाहतीसारख्या भीषण घटना घडू नयेत, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठोस पाऊले उचलली आहेत. धोकादायक रासायनिक कारखान्यांचे परिक्षण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात आली आहे. ज्वालाग्रही पदार्थाची निर्मिती करणारे कारखाने, कंपन्यांवर समितीचे नियंत्रण असणार आहे.
समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक हे अध्यक्ष असतील. तर, कामगार उपायुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विषय तज्ज्ञ म्हणून काम पाहतील. आयसीटी (इंडियन इन्स्टिट्यूट आँफ केमिकल टेक्नॉलाजी) आयआयटी मुंबईच्या रसायन विभागाचे प्रतिनिधी हे विशेष तज्ज्ञ म्हणून काम पाहतील.
तारापूर औद्योगीक वसाहतीत रासायनिक कारखान्यामध्ये 11 जानेवारी रोजी भीषण स्फोट झाला. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबतचा पाहणी अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. यावर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आणि धोकादायक रासायनिक कारखान्यांचे ऑडीट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. कारखान्याचे ऑडिट करण्यासाठी एक समिती गठित करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. त्यानुसार समिती गठित करण्यात आली आहे.
समितीची रचना
समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक हे अध्यक्ष राहणार आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व संस्थांचे प्रतिनिधी काम करणार आहेत. या शिवाय जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, स्थानिक एमआयडीसीचे अग्निशमन महामंडळाचे अधिकारी, विशेष नियोजन प्राधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ज्या ठिकाणी एमआयडीसी क्षेत्राच्या बाहेर कंपन्या आहेत. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. समिती गठित झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. समितीचे सदस्य ही रासायनिक व ज्वालाग्राही प्रक्रिया तपासून पाहणार आहेत. तसेच कर्मचार्यांना पुरवण्यात येत असलेल्या सुरक्षा व आरोग्यबाबतच्या उपयायोजनादेखील तपासणार आहे. रासायनिक व धोकादायक प्रक्रिया हातळण्यासाठी कर्मचार्यांच्याकडे अनुभव आहे किंवा नाही याची खातरजमा केली जाईल.