आमच्या ऊसाला त्यांचा कोल्हा लागणार नाही, शिवसेना नेते संजय राऊत
मुंबई|महाईन्यूज|
आमचे आमदार गळाला लागणार नाहीत. आमचे मासे त्यांच्या जाळ्यात जाणार नाहीत आणि आमच्या ऊसाला त्यांचा कोल्हाही लागणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेत ऑपरेशन लोटसची खिल्लीही उडवली. राऊत म्हणाले की, विरोधकांना रात्री स्वप्नात सत्ता येते आणि सकाळी झोपेतून उठल्यावर सत्ता जाते. हा स्वप्नदोष आहे. १०५ आमदार असतानाही सत्ता येऊ शकली नाही, हा धक्का ते पचवू शकले नाहीत. त्यामुळे ऑपरेशन लोट्सच्या अफवा पसरविल्या जात आहेत. आम्ही त्याला घाबरत नाही.
ऑपरेशन लोटसबिटस काही नसतं. आमचे हातही अनेक ऑपरेशन करून तयार झाले आहेत. आमचेही ऑपरेशन थिएटर आहे. आम्ही नाजूक हाताने सर्वात जास्त चिरफाड करू शकतो. त्यामुळे त्यांना दिवसाढवळ्याही सत्तेची स्वप्न पडत असतात. त्यातूनच आमदार संपर्कात असल्याच्या वावड्या ते उठवत असतात. आम्ही मात्र त्याकडे मनोरंजन म्हणून पाहत असतो, असा टोला राऊत यांनी भाजपला नाव न घेता लगावला.