‘कायम भाजपची पालखी वाहणार नाही, असा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Udhav-Thakarey.jpg)
नागपूर: शिवसेनेने जनादेशाचा अनादर केला, या भाजपच्या टीकेला गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. काँग्रेसशी युती करून शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले नव्हते, ही गोष्ट खरी आहे. परंतु, मी कायम भाजपची पालखी वाहणार नाही, अशा शब्दही बाळासाहेबांना दिल्याचे सांगत उद्धव यांनी भाजपला फटकारले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना कधीपासून दिलेल्या शब्दाचे कौतुक वाटायला लागले, असा टोला हाणत उद्धव ठाकरे यांनी हिशेब चुकता केला.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून शेतकरी कर्जमाफी, राज्यावरील कर्जाचा बोजा आणि जनमताचा अनादर केल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. संत ज्ञानेश्वरांच्या भारूडाचा संदर्भ देत त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारची यथेच्छ खिल्लीही उडविली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणातून फडणवीसांच्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले.
उद्धव यांनी ‘सामना’तील शरद पवारांविषयीची वक्तव्ये, राज्याची आर्थिक स्थिती आणि कर्जमाफी याविषयी देवेंद्र फडणवीसांनी केलेला प्रत्येक दावा खोडून काढला. ‘सामना’तील प्रत्येक शब्दाला मी बांधील आहे. आम्ही सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले होते. याच ‘सामना’त मोदींनी पवार माझे गुरु असल्याची बातमी छापून आली होती. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी सोयीचे तेवढे वाचले. ही गोष्ट योग्य नाही, असे उद्धव यांनी म्हटले.