”केंद्रातील भाजपा सरकारला सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यापासून कोणी रोखले?”- शिवसेना
मुंबई | महाईन्यूज
देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून जोरदार रणकंदन सुरू आहे. राहुल गांधी यांनी मी माफी मागायला सावरकर नाही, असं म्हटल्यानं या वादाला फोडणी मिळाली आहे. त्यानंतर शिवसेनेनंही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सावरकरांच्या बाबतीतील आमच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. त्यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपाला लक्ष्य करण्यात आलेलं आहे.
वीर सावरकर हे क्रांतिकारकांचे शिरोमणी होतेच व प्रश्न इतकाच आहे की , गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार आहे. ‘ भारतरत्न ‘ देऊन सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखले होते ?, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलेला आहे. सावरकरांना ‘कलंक’ आणि ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारी ‘आयात’ मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्याच बाकावर बसली आहेत. त्यांचे तुम्ही काय करणार आहात?, महाराष्ट्रात ढोंग आणि देशात सोंग असा सगळा तुमचा प्रकार आहे. सावरकरांबाबत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता सुधारणा विधेयकावरून देश का पेटला , याचे उत्तर आधी जनतेला द्या, असंही म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधलेला आहे.