शरद पवारांना भारतरत्न द्या; राष्ट्रवादीकडून स्वाक्षरी मोहीम
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी ठाण्यामध्ये सोमवारी राष्ट्रवादीकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहाराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे यांनी ही मोहीम राबवली.
ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एकच्या बाहेर ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. स्थानकाबाहेर एक होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगवर स्वाक्षरी करण्यासाठी ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, ‘या स्वाक्षरी मोहिमेला ठाणेकरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला. तीन तासांमध्ये ९ हजार ७२० नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या.’
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेली ५२ वर्ष राजकारणात आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेते शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा आदर करतात. राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेचे संपूर्ण श्रेय शरद पवार यांना जाते, असे राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.