उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपमधून निलंबित झालेला आमदार कुलदीप सिंह सेंगर दोषी
नवी दिल्ली | महाईन्यूज |
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपमधून निलंबित झालेला आमदार कुलदीप सिंह सेंगरला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. कुलदीप सेंगरविरोधात दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने आज 16 डिसेंबरला आपला निर्णय सुनावला. 2017 च्या अपहरण आणि बलात्कार प्रकरणात आमदार सेंगरला दोषी ठरवत, आरोपपत्र दाखल करण्यात दिरंगाई केल्याने कोर्टाने फटकारही लगावली आहे. 19 डिसेंबर रोजी कुलदीप सिंह सेंगरच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. बंद खोलीत झालेल्या सुनावाणीत न्यायदंडाधिकारी धर्मेश शर्मा यांनी आधीच 16 डिसेंबर रोजी या प्रकरणात निकाल देणार असल्याचं सांगितलं होतं.
2017 मध्ये तरुणीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कुलदीप सिंह सेंगरवर आहे. त्यावेळी तरुणी अल्पवयीन होती. कोर्टाने सहआरोपी शशी सिंह विरोधातही आरोप निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशच्या बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार बनलेल्या सेंगरला या प्रकरणानंतर ऑगस्ट 2019 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. कोर्टाने 9 ऑगस्ट रोजी कुलदीप सेंगर आणि शशी सिंह विरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376 ,506 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गात गुन्ह्याची नोंद केली होती.
तीस हजारी कोर्टानं सीबीआयलाही खडेबोल सुनावले. कोर्टाने म्हटलं आहे की, स्वत:ची आणि कुटुंबीयांचे प्राण वाचवण्यासाठी या प्रकरणाची उशिरा नोंद केली. आम्ही पीडितेच्या मनाची स्थिती समजू शकतो. गँगरेप प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक वर्ष का लावलं? असा सवालही यावेळी कोर्टानं केला.
काय होतं प्रकरण ?
पीडिता आणि तिच्या आईनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. पीडितेच्या वडिलांविरोधात 3 एप्रिल 2018ला शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. 28 जुलै रोजी काकांना भेटून परतताना रायबरेलीत पीडिता, तिची काकी, मावशी आणि वकिलांच्या कारला एका ट्रकनं धडक दिली. यात काकी आणि मावशीचा मृत्यू झाला होता. तर पीडितेचा वकीलही गंभीर जखमी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लखनऊहून दिल्लीला आणून जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे बरेच दिवस त्यांच्यावर उपचार झाले. सध्या पीडिता कुटुंबीयासोबत दिल्ली राहत असून, उन्नावमध्ये परतण्यास तिनं नकार दिला आहे.