उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार, पीडितेला जिवंत जाळलं
मुंबई | महाईन्यूज
आंद्रप्रदेशातील प्रियांका रेड्डी प्रकरणानंतर आता उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार करून पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेने ज्या सहा जणांवर बलात्काराचा आरोप केलाय, त्यांनीच महिलेवर हल्ला करत हे कृत्य केलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला जात असताना रस्त्यात आरोपींनी तिला थांबवलं आणि मारहाण केली आणि भोसकलं. तसंच जिवंत जाळलं आणि पळ काढला. महिलेला उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आलं. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर चाकूने वार करण्यात आले. पीडित तरुणी जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं. यावेळी काहीजणांनी पीडितेची मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिकांनी फोन करुन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
उन्नावचे पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने ज्या सहा जणांची नावं सांगितली होती त्यापैकी तिघांना ताब्यात घेतलं आहे. इतरांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत. पीडितेने रुग्णालयात पोलिसांना जबाब दिला असून, आपण पहाटे ४.३० वाजता बैसवारा बिहार रेल्वे स्थानकावर जात होती. यावेळी हरीशंकर त्रिवेदी, किशोर, शुभम, शिवम, उमेश आणि इतर दोघांना आपला रस्ता अडवला, अशी माहिती दिली आहे. पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार, मार्च २०१९ रोजी आपल्यावर आरोपींकडून बलात्कार करण्यात आला होता. यानंतर आपण एफआयआरही दाखल केला होता.