जे झालं ते झालं, आता नवी सुरुवात करायची : अजित पवार
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन परत स्वगृही परतले आहेत. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले आहेत. काही वेळाने ते महाविकास आघाडीच्या बैठकांमध्येदेखील सहभागी होतील. उद्या (28 नोव्हेंबर) महाविकास आघाडीचे नेते मंत्रीमंडळाची शपथ घेणार आहेत. यावेळी अजित पवार यांना मंत्रीपद मिळणार का? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीतही अजित पवारांना याबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, माझ्या मंत्रीपदाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावळी आमदारांनी अजित पवारांना विचारले की, तुम्ही मंत्री होणार का? त्यावर अजित पवार म्हणाले की, त्याबद्दलचा निर्णय पवारसाहेब घेतील. यावेळी अजित पवार यांनी सर्वांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार म्हणाले की, जे झालं ते झालं. ते संपलंय आता. आता नवीन सुरुवात करायची आहे. पक्षासाठी जोमाने काम करायचं.