उद्याच बहुमत चाचणी घ्या : सुप्रीम कोर्ट
मुंबई | महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तापेच उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घेण्याचा आदेश दिला. तसंच बहुमत चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही, त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची गरज नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. आज (26 नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत न्यायालयाने हा आदेश दिला.
सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर फडणवीस सरकारकडे आता केवळ दीड दिवस शिल्लक आहे. तर या निर्णयामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. आज संविधान दिनाच्या दिवशी संविधानाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तर बहुमताचा ठराव आम्हीच जिंकू, अशा विश्वास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.