‘कॉंग्रेस’वाले भुरटे चोर, तर ‘भाजप’वाले डाकू – प्रकाश आंबेडकर
चंद्रपूर | महाईन्यूज
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे. “काँग्रेस म्हणजे भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहेत”, अशी टीका त्यांनी केली आहे. चंद्रपूरमधील बल्लारपुरात आयोजित जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. “आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी चर्चेची वाट बघत होते,” असा धक्कादायक खुलासाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी भाषणातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडी युतीवर सडकून टीका केली. “मुख्यमंत्री स्वत: घाबरलेले आहेत. त्यांनी वंचित आघाडी विरोधी पक्ष असेल असे भाकीत केलं होतं. पण यावेळी आम्ही सत्तेत बसू आणि भाजप हा विरोधी पक्ष म्हणून काम करेल” असा घणाघातही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“बँका कोणी चोरल्या, कोणी लुटल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थिती लोकांना विचारला. त्यावेळी अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. यानंतर आंबेडकरांनी ते कोणत्या राज्याचे आहेत असे विचारले असता, गुजरात असेही लोकांनी जोरात सांगितले. लुट करणारे हे सर्व गुजराती आहेत, आणि हे राज्यही गुजराती चालवत आहेत. मग जर तुम्हाला तुमच्या बँकेतील पैसे सुरक्षित हवे असतील, तर भाजपला सत्तेवरुन खाली खेचा”, असेही प्रकाश आंबेडकर लोकांना म्हणाले.
सभा संपल्यानंतर आर्थिक मदतीचे आवाहन केले. जनतेने निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला दानपेटीत आर्थिक मदत केली.