भाजपविरोधात काँग्रेसचे देशभरात धरणे आंदोलन
मुंबई : कर्नाटकात भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत काँग्रेसने आज देशभरात एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज दुपारी एक ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान काँग्रेस धरणं आंदोलन करणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. काँग्रेसने जेडीएसच्या साथीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर 104 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनेही सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेला आमंत्रित करुन बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.
भाजपने कर्नाटकात लोकशाहीचा गळा घोटला आहे. बहुमत नसतानाही कर्नाटकात भाजपने सरकार स्थापन करुन संविधानाची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील अमर जवान ज्योत, आझाद मैदान आणि मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काँग्रेसचे अनेक नेते कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती निरुपम यांनी दिली आहे.
तर दिल्लीतील राजघाटावर आज दुपारी 2.45 वाजता काँग्रेस धरणे आंदोलन करणार आहे.