‘२०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू होणार’; अमित शाह यांची मोठी घोषणा

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशातील अंतर्गत सुरक्षा, राजकारण आणि कायद्याच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण विधाने केली. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता असलेल्या देशातील सर्व २१ राज्यांमध्ये २०२९ पूर्वी ‘समान नागरी कायदा’ (UCC) लागू केला जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना अमित शाह म्हणाले, “आम्ही आधीच काही राज्यांमध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आता मला पूर्ण खात्री आहे की, २०२९ च्या आधी भाजप आणि एनडीएचे सरकार असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये आम्ही समान नागरी कायदा पूर्णपणे लागू करू.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बदलांवर भर देताना शाह म्हणाले की, २०१४ पूर्वीचा भ्रष्टाचार, जातिवाद आणि घराणेशाहीचा काळ मागे टाकून देशाने आता ‘कामगिरीवर आधारित राजकारणाचा’ स्वीकार केला आहे. ‘भारत प्रथम’ हे तत्त्व घेऊन केंद्र सरकार काम करत आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या कठोर मोहिमांमुळे भारताचे दहशतवादाबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण जागतिक पातळीवर प्रस्थापित झाल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा
आशिया चषकावर भारताचे निर्विवाद वर्चस्व! फायनलमध्ये श्रीलंकेचा ७२ धावांनी धुव्वा
बेकायदेशीर घुसखोरांना देशाबाहेर काढणार
बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची कठोर भूमिका मांडताना अमित शाह म्हणाले, “देशातील प्रत्येक बेकायदेशीर घुसखोराची ओळख पटवून त्याला देशाबाहेर काढण्याचा सरकारचा निर्धार पक्का आहे. यासाठी विचाराधीन असलेल्या कार्यपद्धतीची गोपनीय माहिती जाहीर केली जाणार नाही; मात्र प्रत्येक घुसखोरावर कारवाई होईल.”
मातृभाषेला प्राधान्य, पण समाजात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव
सध्या सुरू असलेल्या भाषेच्या वादावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, मातृभाषेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. संबंधित राज्यांचे नेतृत्व यावर योग्य तोडगा काढण्यास सक्षम आहे. काही घटक केवळ स्वतःच्या फायद्यासाठी भाषेच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.





