India Vs Pakistan War Stop | भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम!

India Vs Pakistan War Stop | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावानंतर आज एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली. दोन्ही देशांनी शस्त्रविराम लागू करण्याचा निर्णय घेतला असून, आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून सर्व प्रकारच्या गोळीबार, जमिनीवरील लष्करी कारवाया, तसेच हवाई आणि समुद्री हल्ले थांबवण्यावर एकमत झाले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आज दुपारी ३:३५ वाजता पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) यांनी भारताच्या डीजीएमओ यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी तात्काळ शस्त्रविराम लागू करण्याचा निर्णय घेतला. याबाबतच्या सूचना दोन्ही देशांच्या लष्करी यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मिस्री यांनी सांगितले की, पुढील चर्चेसाठी १२ मे रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा एकदा संपर्क साधतील.
हेही वाचा : India-Pakistan War | भारतीय सैन्यदलप्रमुखांना मोदी सरकारकडून फ्री हँड!
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी असल्याचा भारताचा आरोप आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव चिघळला. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, तसेच ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे भारतातील विविध ठिकाणांवर हल्ल्यांचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने प्रत्येक वेळी या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
शस्त्रविरामामागचे कारण
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने शांततेची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी केल्याचे सांगितले जाते. भारताने आपली कठोर भूमिका कायम ठेवताना दहशतवादाविरोधातील लढाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले, “भारताने नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे, परंतु दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.”





