कोकणातल्या मतदारसंघावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये धुसफुस
शिंदे गट फुटला अर्धी शिवसेना गेली, जी उरली ती शिवसेना रोज शिंदे गट नेतोय. मग यांच्याकडे राहिले काय?

रत्नागिरी : रत्नागिरी हा कोकणातला महत्त्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाची ताकद आहे असं मानलं जातं. म्हणा, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभेची निवडणूक जिंकू शकले नाहीत. महायुतीचे नारायण राणे खासदार म्हणून लोकसभेवर गेले. याच कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या राजापूर लांजा विधानसभा मतदार संघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफुस वाढू लागली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी थेट उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर निशाणा साधला आहे.
लांजा इथे सभा घेत अविनाश लाड यांनी राजापूर लांजा विधानसभा मतदार संघावर दावा सांगितला. शिंदे गट फुटला अर्धी शिवसेना गेली, जी शिवसेना उरली, ती शिवसेना रोज शिंदे गट नेतोय. मग यांच्याकडे राहिले काय? मग हे कुठल्या तोंडाने म्हणतात आमची इथं उमेदवारी आहे, अशी टीका अविनाश लाड यांनी केली.
‘कुणी मदत केली हे जग जाहीर’
विनायक राऊत यांना लोकसभेला कुणी मदत केली हे जग जाहीर आहे. काँग्रेस कार्यकत्यांनी मदत केली. राजापूर विधानसभेत काँग्रेसमुळे लीड मिळाला. असं असताना तुम्ही म्हणता आम्हाला तिकिट पाहिजे, असं अविनाश लाड म्हणाले. लांजा राजापूर विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींना चिमटे काढले.
‘त्या आमदारांनी तुम्हाला काय दिले?’
महाविकास आघाडीत असं ठरलय सिटिंग आमदारांची जागा त्या पक्षाला. पण त्यात अजून अट पण आहे, ती जागा जिंकता आली पाहिजे. गेली 15 वर्ष तुम्ही आमदार म्हणुन निवडणून देत आहात. त्या आमदारांनी तुम्हाला काय दिले?असा अविनाश लाड यांनी राजन साळवीना थेट सवाल केला. नवीन लोकं येत आहेत, ज्यांचा सातबारा सुद्धा इथला नाही. नवीन लोकं येवून थेट विकत घ्यायची भाषा करतात, तुमचे काय ते बोला, विचार करा तुमची काय किंमत लावायची राजापूर विधानसभेतून इच्छुक असणाऱ्या उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी समाचार घेतला.





