लग्नाच्या पंगतीत गप्पा नको! पुण्यात कोरोनासाठी नवा नियम

पुणे – पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने आता विवाह सोहळा आणि गर्दीने होणाऱ्या समारंभांसाठी नवे नियम जारी करण्यात आले आहेत. कोणत्याही लग्नात यापुढे वऱ्हाडी मंडळींनी गप्पा मारू नये, असा आदेशच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये आणि सुरक्षित अंतर राखले जावे यासाठी काही नवे नियम केले आहेत. त्यामध्ये लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या मर्यादा ५० करण्यात आली आहे. त्यामध्येच वाजंत्री, भटजी, आचारी आणि मदतनीस यांचाही समावेश असेल. ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पथक यांचे भरारी पथक नेमण्याचे आदेशही जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे लग्नाच्या पंगतीत प्रत्येकी सहा फुटावर खुणा करण्यात याव्यात. जेवण करताना मास्क काढल्यावर जेवणाऱ्यांनी एकमेकांशी गप्पा मारू नयेत. तसेच लग्नास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करा असे आदेशही जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत.





