राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांची ७० कोटींची फसवणूक

अमरावती:- कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात महारयत अॅग्रो इंडिया कंपनीने राज्यभरातील पाच हजार शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत पुढे आलेली आहे. अमरावती येथील गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रोड्यूस वाँरन्टवर सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा.इस्लामपूर, जि. सांगली) या दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतलेले आहे. त्यांना अमरावती येथील न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.
महारयतचा संचालक सुधीर माहिते याने सहकारी संदीप मोहिते याच्या मदतीने राज्यभरातील अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनात स्टॉल लावलेले होते. त्यांच्या कंपनीत ५२५ कर्मचारी कार्यरत होते. त्यांच्या माध्यमातून या कंपनीशी राज्यभरातील अनेक शेतकरी जुळले. १०० कडकनाथ कोंबड्यांमागे तब्बल ३ लाख १५ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची हमी त्यांनी शेतकऱ्यांना दिलेली होती. पक्षी व अंडी आम्हीच खरेदी करू, असेही सांगितले होते. मात्र, कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सुविधा अथवा कोंबड्या खरेदी करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतक-यांकडील कोंबड्या दगावलेल्या आहेत.





