मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे. गेल्या १२ ते १४ तासांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. एवढंच नाही तर ठाण्यातही कोसळधार आहे. त्याचमुळे हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी घोषणा केली आहे.
मुंबईसह ठाणे,कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.त्यामुळे खबरदारीचा व नागरिकांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून आज (मंगळवार,दि.२ रोजी)सर्व शाळा, महाविद्यालयात, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद राहतील,असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
नागरिकांनी आपापल्या घरात सुरक्षितपणे रहावे, पर्जन्यमान स्थितीचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे.मुलांना,ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडू देऊ नये, असे आवाहन ही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाच्या आज, मंगळवार दिनांक २ जुलै २०१९ रोजीच्या theory & practical या दोन्ही परीक्षा अतिवृष्टी चा इशारा लक्षात घेता तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी च्या अनुषंगाने, विद्यार्थींच्या सुरक्षितेसाठी स्थगित करण्यात आलेल्या आहे. सदर परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच विद्यापीठ संकेतस्थळ तसेच प्रेस नोट द्वारे प्रसिध्द करण्यात येतील. सर्व विद्यार्थींनी कृपया नोंद घ्यावी असे मुंबई विद्यापीठाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.







