सत्तेचं दार बंद झाल्याने भाजपची मळमळ सुरु, रुपाली चाकणकरांची बोचरी टीका
पुणे | राज्यातील धार्मिक स्थळं आणि मंदिरे पुन्हा सुरु करण्यात यावीत यासाठी भारतीय जनता पक्षाकडून काल (शनिवार) घंटानाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ असा जयघोष करत भाजपच्या नेत्यांनी राज्यभर घंटानाद आंदोलन केलं. यावेळी भाजपने राज्यातील सर्व मंदिरे आवश्यक नियम आखून त्वरित सुरु करण्यात यावीत अशी मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून या विषयावरुन भाजपने राज्य सरकारवर टीका सुरु केली आहे. त्यामुळे याप्रकरणी राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. सत्तेची दारं बंद झाल्याने भाजपचं घंटानाद आंदोलन सुरु असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना सुरु झाला आहे. दार उघड उद्धवा… असं म्हणत भाजपने केलेल्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी चाकणकर यांनी देखील भाजपवर बोचरी टीका केली आहे.