सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा ; पाणी टंचाईवरुन भाजपला घरचा आहेर
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधकांसह स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर निषेधार्थ मोर्चा काढत घरचा आहेर दिला. पिंपळे निलख-वाकड प्रभागातील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्थानिक नागरिकांसह महापालिकेवर मोर्चा काढला.
नगरसेवक तुषार कामठे यांनी काढलेल्या या मोर्चात भाजपाचे नगरसेवक संदीप कस्पटे, आरती चोंधे, सुजाता पालांडे यांनी देखील पाठींबा दर्शवत प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
पिंपळे निलख-वाकड प्रभागात गेल्या महिन्यापासून विस्कळीत तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही पाण्याची समस्या जैसे थे आहे. त्याचाच निषेध करण्यासाठी या प्रभागातील नागरिकांना नगरसेवक तुषार कामठे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढला. आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. यासभेपूर्वी कामठे यांनी महापालिकेवर प्रभागातील नागरिकांसह मोर्चा आणला होता. मात्र मुख्यालयाच्या प्रवेशव्दारावरच हा मोर्चा आडवण्यात आला. यावेळी मोर्चात असलेल्या नागरिकांनी गेटसमोर ठिय्या मांडत महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पक्षाची नाचंकी होऊ नये म्हणून तुषार कामठे यांचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र कामठे यांना जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. अखेर पक्षनेत्यांनी आयुक्तांसोबत चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्यावतीने देखील सत्ताधारी भाजपच्या निषेधार्थ महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे कामठे यांनी काढलेल्या या मोर्चामुळे भाजपला चांगलाच घरचा आहेर मिळाला असल्याची चर्चा सुरू होती.