शिरुर लोकसभेत भाजपा ‘आत्मनिर्भर’; मग आजी-माजींची ढकलाढकली कशाला?
डॉ. कोल्हे अन् आढळराव-पाटील समर्थकांत ‘सोशल वॉर’
भाजपा प्रवेशाच्या वावड्यांनी मतदारसंघात राजकीय चर्चा
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
शिरुर लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये ‘सोशल वॉर’ सध्या पहायला मिळत आहे. एकीकडे डॉ. कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार, तर दुसरीकडे आढळराव पाटील भाजपात प्रवेश करणार, अशी वावडी उठवली जात आहे. मात्र, शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये उमेवादीसाठी भाजपा ‘आत्मनिर्भर’ असताना पक्षप्रवेशाच्या वावड्या कशासाठी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात सलग तीनदा बाजी मारणारा शिवसेनेचा ‘वाघ’ शिवाजीराव आढळराव पाटील २०१९ मध्ये पराभूत झाले. संपूर्ण राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबियांचे स्वप्न साकार करीत अभिनेता, डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुरचे मैदान चितपट मारले. मतदार संघावर प्रभावी पकड असलेल्या आढळराव पाटलांचा पराभव झाला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. महाविकास आघाडी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्रितपणे सरकार स्थापन केले. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढवल्या जातील, असे तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे जागा वाटपात विद्यमान मतदार संघात ज्या पक्षाचा उमदेवार, त्या पक्षाला तिकीट…या सूत्रानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुरमधून डॉ. आमोल कोल्हे यांना पुन्हा राष्ट्रवादीचे तिकीट मिळणार आहे. शिवसेनेला कदाचित जागा गमवावी लागणार आहे. परिणामी, आढळराव पाटील समर्थकांमध्ये काहीशी अस्वस्थता दिसते. तर, मतदार संघातील राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी हैराण केल्यामुळे डॉ. कोल्हे भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी वावडी उठवण्यात आली.
विशेष म्हणजे, ‘खात्रीलायक वृत्त’ अशी सोशल मीडियावर बतावणी करुन द्वीपक्षीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली जात आहे. ‘ज्याचा उमेदवा त्याची जागा’ या सूत्रानुसार शिरुरची जागा राष्ट्रवादीकडे राहील. आढळराव पाटील भाजपामध्ये आल्यास मानाचे पान मिळेल, पण तिकीट मिळणार नाही. डॉ. कोल्हे यांना राष्ट्रवादीत मान आहे. पण, स्थानिक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्याला कंटाळून डॉ. कोल्हे भाजपा वाटेवर जाण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांच्या फॅन फॉलोअर्सला ते मान्य होणारे नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
भाजपा तुम्हाला का भाव देईल?
वास्तविक, भारतीय जनता पार्टी आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे भाजपाचा ४०० हून अधिक जागा जिंकेल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार आयात का करेल? असा प्रश्न आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचा विचार करता सध्यस्थितला पक्षाकडे माजी आमदार बाबुराव पाचर्णे, योगेश टिळेकर यांच्यासह महाराष्ट्रातून सर्वाधिक चार क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलेला आमदार महेश लांडगे असे तीन उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपा आयारामांना का भाव देईल? असा प्रश्न भाजपा समर्थकांमधून उपस्थित केला जात आहे.