रोजगार निर्मीतीसाठी केवळ मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर अवलंबून राहता येणार नाही
न्युयॉर्क – भारतात दरवर्षी लक्षावधी युवकांना रोजगार पुरवावा लागतो. त्यासाठी भारत जर केवळ उत्पादन क्षेत्र म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावरच अवलंबून राहणार असेल तर त्यांना इतकी रोजगार निर्मीती करता येणार नाही असे प्रख्यात व्यावसायिक अजय बंग यांनी म्हटले आहे. अजय बंग हे मास्टरकार्ड कंपनीचे सीईओ आहेत.
अमेरिका भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की आर्थिक विकासासाठी आणि रोजगार निर्मीतीसाठी भारताने मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रावर नको इतका भर दिला आहे. ही स्थिती चिंताजनक आहे. प्रत्येक जणच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात उतरू पहातोय ते चुकीचे आहे असे माझे मत आहे. भारतात उत्पादन क्षेत्राला फार वाव मिळू शकत नाहीं कारण भारतात उत्पादन खर्च अन्य राष्ट्रांपेक्षा खूपच अधिक आहे. शिवाय भारताला आर्थिक विकासाचे अन्य मार्ग शोधावे लागतील.
जुन्या नियमानुसार भारताला आर्थिक विकास साधता येणार नाही. जीएसटी, नोटबंदी, कौशल्य विकास अशा सारख्या कार्यक्रमांनी भारताने काही प्रमाणात वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण अजूनही त्यात मोठ्या सुधारणांना वाव आहे.
पर्यटनासारख्या क्षेत्रावरही भारताने मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे असे ते म्हणाले. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आता मोठ्या प्रमाणात रोबोटिक्स मॅन्युफॅक्चरींग पद्धत येत आहे. त्यातून या क्षेत्रातील वातावरणच बदलणार आहे. त्यामुळे भारताला आता केवळ या एका क्षेत्रावरच रोजगार निर्मीतीसाठी अवलंबून राहता येणार नाही. रोजगार निर्मीतीसाठी जे अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्यातील हा एक छोटा पर्याय आहे असेही बंग यांनी नमूद केले.